SHARAD PAWAR : PM मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी चिंताजनक; शरद पवार यांचा पलटवार

नितीन नांदुरकर, जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार हे जळगाव दौऱ्यावर असून त्यांनी पत्रकार परिषदेत थेट पंतप्रधान मोदींवर पलटवार केला. शरद पवार या वयात स्वत:चे कुटुंब सांभाळू शकले नाहीत, ते पक्ष काय सांभाळणार अशी टीका पंतप्रधान मोदींनी मुलाखतीत केली होती. शरद पवार यांनी मोदींच्या या टीकेवर पलटवार करताना त्यांनी कोणतं कुटुंब सांभाळलं? मी त्या पातळीवर जावू इच्छित नाही असं म्हटलं.

शरद पवार म्हणाले की, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी अतिशय चिंताजनक आहे. मात्र असं आपण व्यक्तिगत बोलू नये. पण त्यांनी जे पथ्य पाळलं नाही. आपण ते पथ्य न पाळण्याची भूमिका घेण योग्य नाही. मोदींनी स्वतःचं कुटुंब कुठे सांभाळलं?  मोदींनी कोणतं कुटुंब सांभाळलं. जो कुटुंब सांभाळू शकला नाही तो महाराष्ट्र काय सांभाळणार? असा प्रश्नही शरद पवार यांनी विचारला.

मोदींनी अनेक आश्वासन कृतीत आणली नाही. मोदींविरोधात लोकांमध्ये नाराजी आहे. आमची प्रार्थना आहे की ठाकरेंना मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये. देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रात किती वेळा येत आहेत. यावरूनच समजतंय की ही निवडणूक त्यांच्यासाठी किती कठीण आहे. मनमोहन सिंग शांततेत त्यांचं काम करायचे मात्र मोदी त्यांच्या कामांचा गाजावाजा करत आहेत असंही शरद पवार म्हणाले.

देशात शेतकरी अस्वस्थ असून त्याची किंमत सरकारला मोजावी लागेल. मोदींनी अनेक गोष्टी सांगितल्या होत्या मात्र त्या केल्या नाहीत. मोदींच्या बोलण्यात विरोधाभास दिसत आहे. परिस्थिती वेगाने बदलते आहे. मोदींविषयी जी आस्था जी होती ती कमी होतेय. मोदींनी अनेक गोष्टी सांगितल्या मात्र प्रत्यक्ष कृती त्या आणल्या नाहीत. सरकारची परिस्थिती आहे की नाही हे न बघता ते थेट कुठल्याही निर्णयाबद्दल बोलतात अशी टीका शरद पवार यांनी केली.

राज्यात मविआला लोकसभेत किती जागा येणार या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, सध्या माझे लक्ष दहा जागांवर आहे. मात्र यावेळी बदल अनुकूल दिसतो आहे. काँग्रेसला 10 ते 12 जागा मिळतील आणि आम्हाला आठ ते नऊ सुध्दा मिळू शकतात. गेल्या वेळचं चित्र आणि आताचे चित्र वेगळं आहे. जमीन आसमानचा फरक आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या अनेक सभा महाराष्ट्रात होत आहेत. यावरूनही शरद पवार यांनी थेट निशाणा साधला. ते म्हणाले की, सरळ सरळ आहे देशाचे प्रधानमंत्री किती वेळा महाराष्ट्रात येत आहेत. त्यामुळे यावरून असे स्पष्ट होतं की त्यांना निवडणुका जिंकण्याचा आत्मविश्वास नाही. त्यामुळे त्यांचा हा पुन्हा पुन्हा राज्यात येण्याचा प्रयत्न आहे. आता त्यांनी 400 चा आकडा आणखी खाली आणला आहे.. ज्यावेळेस प्रत्यक्ष निवडणूक होतील त्यावेळेस त्यांचा आकडा हा आणखी खाली आलेला दिसेल.

2024-05-04T05:05:04Z dg43tfdfdgfd